विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचा पहिला वारकरी कसा निवडला जातो?
आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय #महापूजा पार पडते. यावेळी एका वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळतो.
वारकरी, विठ्ठलभक्त ज्या सोहळ्याची, ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार, आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडते. यावेळी एका वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळतो.
पण कोणत्या वारकऱ्याला मान द्यायचा हे कसं ठरतं?कोण ठरवतं?
१९७३ पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा केली जाते. त्यांच्यासोबत हे वारकरी दांपत्य उपस्थित असतं. हे मानाचे वारकरी ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे मंदिर समितीला असतो. विठ्ठलाची पूजा ही पहाटे पार पडते. त्यावेळी मुख्यमंत्री मंदिरात दाखल झाले की मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. त्यानंतर पूजेची तयारी सुरू होते. महापुजेसाठी दर्शन रांग थांबवली जाते. ही दर्शन रांग जिथे थांबवली जाते तिथे असणाऱ्या पती-पत्नी अर्थात रांगेत पहिल्या जोडप्याचा शोध घेतला जातो. पहिलं दाम्पत्य मिळाल्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे का याची विचारणा केली जाते. त्या वारकरी दाम्पत्याच्या गळ्यात तुळशीची माळ असल्यास या दाम्पत्याची मानाचं वारकरी दाम्पत्य म्हणून निवड केली जाते शिवाय मंदिर समितीतर्फे त्यांचा सत्कारही केला जातो.
या वर्षी (२०२५)नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले आणि त्यांच्या पत्नी कल्पना उगले यांना यंदाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे.