नाशिक प्रतिनिधी: शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२४ या दरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मनाई आदेश लागू केले आहेत.
सामाजिक, राजकीय वेगवेगळ्या प्रकरणे यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारत येत नाही. तसेच आरक्षणासंदर्भात आंदोलने सुरू आहेत. तसेच या साऱ्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता कायम राहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या दरम्यान १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू केले आहेत.
त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाही. दगड, शस्त्र, लाठ्या, बंदुका बागळता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा प्रतिमेचे पद्रर्शन किंवा दहन करता येणार नाही. आरडाओरड, वाद्य वाजवण्यास बंदी असेल. प्रक्षोभक भाषण, वर्तवणूकीस बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके फोडणे, अशा अनेक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. पूर्वपरवानगी शिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र राहतील असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.