छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगासाठी प्रेरणादायक – डॉ. प्रमोदकुमार हिरे

नाशिक प्रतिनिधी/: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण कार्यात समाजातील सर्व जाती- धर्मातील लोकांना सोबत घेवून कार्य केले. त्यांच्यातील युध्दकौशल्य, चिकित्सक बुद्धी, दूरदृष्टीकोण, कामकाजातील समन्वय, रयतेसाठी शुद्ध हेतूने व आत्मीयतेने केलेले कार्य प्रत्येकाच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिवरायांच्या कार्यपद्धतीचा आज संपूर्ण जग प्रेरणा घेत आहेत अशा या राज्याच्या जन्मभूमीत आपण जन्माला आलो हे आपले भाग्यच आहे; आणि याचा आपल्याला  अभिमान असल्याचे प्रतिपादन डॉ. प्रमोदकुमार हिरे यांनी केले आहे.

राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र, नाशिक या संस्थेला ४४ वर्ष पूर्ण होत असून ४५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात “व्यस्थपनातील गुरु श्री छत्रपती शिवाजी महाराज” यावर डॉ. प्रमोदकुमार हिरे बोलत होते. यावेळी त्यांनी ‘प्रतापगड युद्धातील छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्कृष्ट व्यवस्थापन’ द्वारे अफजलखान चा कसा वध केला हे चित्रफितीच्या आधारे माहिती देत उपस्थितांना जणू काही त्याकाळात गेल्याचा आभास करून दिला.

कार्यक्रमापूर्वी प्रमुख वक्ते डॉ. प्रमोदकुमार हिरे, संस्थेचे अध्यक्ष विनायक येवले, सचिव प्रवीण कुलकर्णी, उपाध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेटटीवार, भास्कर कवीश्वर, कोषाध्यक्ष भालचंद्र कर्वे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संस्थपाक अध्यक्ष मेजर सुधाकर पिसोळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची उत्साहाने सुरवात झाली. 

शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यातून इतिहास निर्माण केला. त्यांच्या कार्यामुळे भारत देशच नाही तर संपूर्ण जग आज प्रेरणा घेत आहे. त्यांच्या कार्याविषयी मोठमोठया विद्यापीठात आज धडे दिले जाऊन संशोधन केले जात आहे अशा या राज्याच्या जन्मभूमीत आपण जन्मलो याचा आपल्याला सार्थ अभिमान असावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या धैर्या, पराक्रमा आणि दूरदृष्टीने स्वराज्य स्थापन केले. त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली, एक सुसंघटित प्रशासन व्यवस्था निर्माण केली. सर्व जातीधर्माच्या लोकांचा सहभाग असल्याने ते रयतेचे राजे आहेत. मातृत्वाचा आदर, इतर धर्माचा सन्मान तसेच लहान थोर सर्वांचा सन्मान  त्यांच्या कार्यातून केल्याने जीवाला जीव देणारे माणसं निर्माण झाली व यातून स्वराज्य निर्माण झाले, अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा पट डॉ. प्रमोदकुमार हिरे यांनी उलगडला.

कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्याकरिता भास्कर कवीश्वर, चंद्रशेखर जोशी यांनी अथक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अमृता कवीश्वर, आभारप्रदर्शन सीए भालचंद्र कर्वे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *